Search This Blog

Tuesday, September 12, 2017

ग्रामपंचायत: 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 12: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी; तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम 1 सप्टेंबर 2017 जाहीर केला होता. त्यानुसार 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार होते; परंतु 14 ऑक्टोबर 2014 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती. त्यावर संबंधित विभागीय आयुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोंदियात दुपारी 3 पर्यंतच मतदान
गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी दुपारी केवळ 3 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्यात 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692.