Search This Blog

Friday, June 23, 2017

ग्रामसभेला गणपूर्तीची आवश्यकता नाही

ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठीच्या
ग्रामसभेला गणपूर्तीची आवश्यकता नाही
मुंबई, दि. 23: राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 8 हजार 439  ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत आणि प्रारूप प्रभाग रचनेची माहिती ग्रामस्थाना देण्यासाठी घ्यावयाच्या ग्रामसभेकरिता गणपूर्तीची (कोरम) अट नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून 01 जून 2017 रोजी देण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणाच्या सोडतीची प्रक्रिया सर्व जिल्ह्यांत सुरू आहे. त्याच्या माहितीसाठी व निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्याकरिता सर्व संबंधित ग्रामपंचायतींत ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमाच्या आदेशात आता केलेल्या अंशत: बदलानुसार ही ग्रामसभा केवळ मतदार म्हणून पात्र असलेल्या ग्रामस्थांची सभा म्हणून गणण्यात येईल. या सभेस गणपूर्तीची आवश्यकता नाही; तसेच प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणास सभेच्या मान्यतेची अटदेखील लागू असणार नाही. ग्रामस्थांच्या केवळ माहितीसाठी ही सभा असेल, असे श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम सुरू असलेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय आकडेवारी: पालघर- 102, ठाणे- 66, रायगड- 251, रत्नागिरी- 236, सिधुदुर्ग- 345, नाशिक- 193, धुळे- 108, जळगांव- 230, नंदुरबार- 53, अहमदनगर- 278, पुणे- 311, सोलापूर- 258, सातारा- 337, सांगली- 462, कोल्हापूर- 489, औरंगाबाद- 218, बीड- 859, नांदेड- 178, परभणी- 126, उस्मानाबाद- 166, जालना- 285, लातूर- 357, हिगोली- 62, अमरावती- 273, अकोला- 281, यवतमाळ- 101, वाशीम- 288, बुलडाणा- 321, नागपूर- 246, वर्धा- 118, चंद्रपूर- 61, भंडारा- 380, गोंदिया- 358 आणि गडचिरोली- 42 एकूण- 8,439

Wednesday, June 14, 2017

मतदान पावती यंत्रासाठी निधी



 मतदान पावती यंत्रासाठी निधी उपलब्ध करून देणार:मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल’च्या (व्हीव्हीपॅट) म्हणजे ‘खात्रीदर्शक मतदान पावती यंत्र’ खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी राज्य निवडणूक आयोगाला प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
येथील सह्याद्री अतिथिगृहात लोकशाही सुदृढीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारर्दशक करण्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत झालेल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. गिरिराज, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयोगाचे सचिव शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्या यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आयोगाचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, श्री. सहारिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मोठ्याप्रमाणात निवडणूक सुधारणा अंमलात आणून निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक केली. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा लौकिक आहे. त्यात निवडणूक आयोगांचे स्वतंत्र अस्तित्व हा फार महत्वाचा घटक ठरला आहे. राज्य निवडणूक आयोगाचेही स्वतंत्र स्थान अबाधित राखण्यात शासन कुठेही कसर ठेवणार नाही. त्याचबरोबर 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठीदेखील शासन आयोगाला पूर्णपणे सहकार्य करेल.
            आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत माहिती देऊन श्री. सहारिया म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅट वापरण्याचा आयोगाचा मानस आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. इतरही कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचबरोबर पुनर्वसित गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात अडचणी येतात. काही ठिकाणी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांअभावी निवडणुका होऊ शकत नाहीत; तसेच आरक्षित जागेवर विजयी झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे निवडणुकीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत.
            स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भावी वाटचाल करताना मतदार याद्या अधिक बिनचूक करणे, मतदार जागृती आणि मतदार शिक्षण ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पारदर्शकता आणण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही श्री. सहारिया यांनी सांगितले.